Sunday 29 April 2012

संत बसवेश्वर


लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर

आज क्रांतीकारक आणि महान समाजसुधारक संत बसवेश्वर यांची जयंती आहे. बाराव्या शतकात या महान विचारवंताने जी क्रांती केली त्याची दखल जगभरात घेतली गेली. लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक असलेले बसवेश्वर समता वादी होते. तत्कालीन सनातनी हिंदू धर्मावर बसवेश्वरांनी आसूड ओढले. अंधश्रद्धेने ग्रस्त झालेल्या तत्कालीन समाजाला पुनर्जिवन देण्याचे काम महात्मा बसवेश्वर यांनी केले. 

संत बसवेश्वर यांचा जन्म इ.स.११३२ मध्ये कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे वै. शु. अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे बसवेश्वरांना लहानपणापासून समाजातील असमानतेबद्दल प्रचंड चीड होती. दलितांवर हिंदू उच्चवर्णींयांकडून होणारे अत्याचार बसवेश्वरांना सहन होत नव्हते म्हणूनच वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपली मुंज करून घेण्यास स्पष्ट नकार दिला व आपल्या पालकांना अट घातली की जर दलितांची, शूद्रांची मुंज होत असेल तरच मी माझी मुंज होऊ देईन. एवढ्या लहान वयात बसवेश्वरांनी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते.  सामाजिक समता हाच बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा होता. मी जेव्हा जेव्हा संत बसवेश्वरांच चरित्र वाचतो तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो. शेकडो वर्षापूर्वी ज्याकाळी अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा प्रचंड पगडा जनमानसावर होता. शूद्रांवर अनन्वीत अत्याचार होत होते. त्याकाळात बसवेश्वरांनी जे धाडस केल त्याने मी पूर्ण प्रभावित झालोय. एक व्यक्ती या सर्वांविरुद्ध उभा राहतोय आणि एक यशस्वी लढा देतोय ह्याची कल्पनाही करवत नाही. संत बसवेश्वरांनी जे काही कार्य केले ते कार्य सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवलेला इतिहास झालाय. अवघ्या ३५ वर्षाच आयुष्य (११३२ ते ११६७) आणि या अल्प आयुष्यात बसवेश्वरांनी बहुजन जनतेसाठी प्रचंड कार्य केले. माणूस आणि माणुसकी हा बसवेश्वरांचा मूलमंत्र होता. त्यांनी अस्पृश्यता, जातीयवाद, कर्मकांड, अनेक देवतावाद, स्त्री – पुरुष भेदाभेद ह्या विरुद्ध लढा दिला.

११४१ मध्ये बसवेश्वरांनी ‘अनुभव मंडप’ या पहील्या लोकशाही संसदेची स्थापना केली. या संसदेची रचना समाजातील सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी होती. पहिल्या संसदेत मांग, महार, शिंपी, बहुरूपी, मेंढपाळ, धनगर, धोबी, कोळी, शेतकरी, न्हावी, गुराखी, महिला असे सर्व समाजाचे प्रतिनिधी सामील झाले. जातीयता नष्ट करणे हे संत बसवेश्वरांचे पहिले उद्दिष्ट होते. या संसदेत स्त्रीयांसाठी विशेष आरक्षण होते. संत बसवेश्वरांनी विधवापुनर्विवाहास पूर्ण मान्यता दिली त्याचवेळी बालविवाहास विरोध केला. शेकडो वर्षापूर्वी जातीयता नष्ट करण्यासाठी संत बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. एवढ करून ते थांबले नाहीत. त्यांनी स्वत: अनुभव मंडप संसदेत एका ब्राम्हण मुलीचा विवाह एका अस्पृश्य मुलाशी करून आंतरजातीय विवाहाची मुहूर्तमेढ रोवली. ते अनेक वेळा अस्पृश्यांच्या घरी जेवण करत असत. अस्पृश्यांना स्वत:च्या घरी मुक्त प्रवेश देत असत.

बसवेश्वर यांच्या यां कार्यामुळे तत्कालीन धर्म कट्टरवादी चिडले. बसवेश्वराना बहिष्कृत करण्यात आले. त्यांना पंतप्रधान पद सोडाव लागले. अनेक भ्रष्टाचाराचे खोटे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. चौकशी अंती त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध झाला आणि संत बसवेश्वरांची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली.  बसवेश्वर यांची अनुभव मंडप ही संसद भारतात लोकप्रिय होत गेली. अनेक लोक या क्रांतीत सहभागी झाले. मंडपात येणाऱ्या मागासवर्गीय लोकांनाही बसवेश्वरांनी देवाच्या पूजेचा आणि धार्मिक शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देण्यासाठी बसवेश्वर यांनीच पुढाकार घेतला. त्यांनी सुतक आणि विटाळ यां प्रथा नाकारल्या. वेश्या आणि विधवांचे पुनर्विवाह लावून दिले. स्त्रीयांसाठी साक्षरता केंदांची निर्मिती संत बसवेश्वर यांनीच केली. परिश्रम हीच खरी पूजा असे संत बसवेश्वरांना वाटायचे. त्यामुळे कष्टाचे महत्व त्यांनी सामान्य जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला.  
      
संत बसवेश्वर यांनी जातीयता मोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बाराव्या शतकात जातीयतेची निरर्थकता समाजाला पटवून दिली. सनातनी धर्मांध लोकांकडून हीन वागणूक मिळूनही बसवेश्वर खचले  नाहीत. ईश्वरप्राप्ती साठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही हाच संदेश बसवेश्वर यांनी दिला. व्यक्तीच्या जन्मावरून नव्हे तर त्याच्या कार्यावरून त्याची ओळख निर्माण होते हे बाराव्या शतकात लोकांना पटवून देणे सोप नव्हत पण बसवेश्वरांनी ते साध्य केल. संत बसवेश्वरांकडे प्रचंड दूरदृष्टी होती. संपत्तीचे योग्य वाटप कसे व्हावे, स्त्रियांना कसे योग्य स्थान दिले जावे, जातीभेद कसा नष्ट केला जावा या आणि अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी अनुभव मंडपात मार्गदर्शन केले. आजही बसवेश्वरांनी दिलेल्या शिकवणीची समस्त मानवी समाजास गरज आहे. भारतीय समाजात क्रांतीच बीज पुरणारया या महामानवास विनम्र अभिवादन.

Tuesday 10 April 2012

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर

आजवर ज्या महान व्यक्तींनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांचा वारसा पुढे न्यायचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आज आपण अशाच एका महान समाजसुधारकाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीने  समाजाच्या आणि गावाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आपल पूर्ण आयुष्य खर्च केलं त्या व्यक्तीबद्दल लिहायला मिळणे हे मी माझ भाग्य समजतो. निर्भय समाजसुधारक, भाषाशास्त्रज्ञ आणि उदारमतवादी विचारवंत कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचा जन्म २४ डिसेंबर १८५० या दिवशी अहमदनगर येथे लष्करी छावणीत झाला. त्यांचे वडील कै. धोंडजी सखाराम खानोलकर हे ब्रिटीश लष्करात नोकरीस होते. धोंडजी खानोलकर हे बुद्धीमान, नम्र आणि विद्याव्यासंगी होते. त्यांच्या या स्वभावगुणांमुळे ते लष्करात खूप लोकप्रिय होते. त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी अशी चार अपत्ये होती. डॉ. रामजी हे जेष्ठ चिरंजीव. डॉ. रामजी अत्यंत हुशार असल्यामुळे वडीलांनी त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली. डॉ. रामजी खानोलकर यांचा जीवनप्रवास बराच खडतर होता. कराची येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. रामजी सकाळी काम करायचे आणि रात्री एकाग्रतेने अभ्यास करायचे. त्यांनी स्वयंशिस्त कधीच मोडली नाही.

कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असल्यामुळे वयाच्या २० व्या वर्षी ते मेडीकल स्कूलची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची नेमणूक लष्करामध्ये सब असिस्टंट सर्जन म्हणून झाली. त्यांनी लष्करासोबत अनेक देशांचा प्रवास केला. इराण, अफगाणिस्तान, एडन, चीन, अरबस्थान या देशांचा प्रवास त्यांनी केला. १८८६ साली त्यांची नेमणूक क्वेटा या शहरातील सरकारी लष्करी इस्पितळात झाली. १९०० च्या चीन मधील बॉक्सर युध्दात त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. १९०६ साली ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यावर लोकाग्रहास्तव त्यांनी क्वेटयातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. क्वेटा शहरात त्यांनी स्वत:चा खाजगी दवाखाना सुरू केला. क्वेटातील पंजाबी, बलुची, सिंधी, शीख जमातीमध्ये ते खूप लोकप्रिय होते. लोकांना रामजींबद्दल आदर आणि विश्वास होता. त्याकाळी दिवाण जमित राय आणि रामजी खानोलकर यांची "Grand Old Men of Quetta" अशी ओळख होती. एक कोकणी डॉक्टर बलूचीस्तानच्या क्वेटा शहरात निस्वार्थीपणे मानवसेवा करत होता याच अनेकांना आश्चर्य वाटायचं. त्यांच्या कार्याचा बलुची लोकांवर खूप प्रभाव होता.

रामजी चांगले डॉक्टर तर होतेच पण ते चांगले माणूस आणि नागरिक देखील होते. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू होता. अखिल मानवी समाजाबद्दल त्यांना प्रेम होते आणि त्यामुळेच ते आदरणीय होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. संकुचित दृष्टिकोन कधीच नव्हता. समाजाला सुधारायचे असेल तर शिक्षणाची गरज त्यांनी ओळखली आणि त्यामुळे त्यांनी ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसाराच पवित्र कार्य हाती घेतलं. समाजसुधारकांच्या नामावलीत रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचे नाव बरेच वरचे आहे. परमवीरचक्राची निर्मिती करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर लिहितात की, "He initiated a campaign against the Temple artist system custom. It was mainly thanks to him that a law was passed by the British India in this respect. He encouraged villagers by arranging for their tutions and crusading in favor of laws to better the community."

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांनी १८९२ साली जोरदार समाजसुधारणा मोहीम हाती घेतली. जुन्या लोकांनी सुरू केलेली ही मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पुढे चालवली. सावंतवाडी संस्थानचे (सावंतवाडी, वेंगुर्ला,डिचोली,पेडणे,कुडाळ आणि मळेवाड) तत्कालीन पोलिटिकल एजंट कर्नल नट यांच्या सल्यानुसार त्यांनी प्रथम शिक्षणप्रसारावर भर दिला.  १९०३ साली मठ (पूर्वीचे सावंतवाडी संस्थान) ता. वेंगुर्ला येथे स्वखर्चाने शाळा सुरू करून सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली. सर्वच समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या. अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी खानोलकर यांनी शिष्यवृत्ती दिल्या. रायसाहेब यांनी गावच्या मुलभूत गरजा म्हणजेच विहिरी, धर्मशाळा आणि शिक्षणाची सोय ह्यावर लक्ष केंद्रीत केलं. आजही खानोलकरांनी स्थापन केलेले प्राथमिक विद्यालय आणि माध्यमिक विद्यालय दिमाखात उभे आहे आणि शिक्षणप्रसाराचे काम करत आहे. रायसाहेब रामजी खानोलकर यांचे समाजकार्य केवळ स्वत:च्या गावापुरते मर्यादित नव्हते. क्वेटातही त्यांनी बरेच समाजकार्य केले. क्वेटा येथे त्यांनी स्वखर्चाने बहुजनांसाठी धर्मशाळा स्थापन केली. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हे क्वेटामधील हिंदूपंचायत आणि स्वामी देशराज धर्मशाळा (प्रार्थना मंदीर) या संस्थांचे कित्येक वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या समाजसेवेच्या प्रभावामुळे क्वेटा येथील रस्त्याला "रामजी लेन" असे नाव दिले होते. आजही स्वतंत्र पाकिस्तानने हे नाव कायम ठेवले आहे. आजही क्वेटा मधील तो रस्ता रामजी लेन या नावानेच ओळखला जातो. पाकिस्तानमधील एका खाजगी कंपनीच्या वेबसाईटवर मिळालेला पत्ता त्याचाच पुरावा आहे.    
       
रायसाहेब रामजी खानोलकर हे संस्कृतचे प्रकांडपंडित होते. त्यांचा वेदांचा अभ्यास दांडगा होता. वेदांतील आदर्श जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत. परोपकारी वृती मानवी जीवनात फार महत्त्वाची आहे. परोपकार विरहीत जीवन जगणारा मनुष्य हा कोणत्याही धर्मात धिक्कार करण्यासारखाच असतो. परोपकार करणारी कोणतीही व्यक्ती पूजनीय असते. प्राणी मेल्यावर त्याची चामडी जर उपयोगात येत असेल तर तो प्राणीही धन्य आणि पूजनीय बनतो.
परोपकारशून्यस्य धिक् मनुष्यस्य जीवितम् । 
जीवन्तु पशवो येषां चर्माप्युपकरिष्यति॥ 
कालिदासाच्या साहित्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. रायसाहेब  रामजी खानोलकर अतिशय सात्विक होते. ते पूर्ण शाकाहारी होते. त्यांना कधीही तंबाखू किंवा दारू इत्यादी व्यसनांचा स्पर्शही झाला नाही. रायसाहेब दर दोन वर्षांनी आपल्या मठ येथिल घरी येत असत. त्यावेळी वाटेत कराचीत ते आपल्या मित्रपरीवाराची जरूर भेट घेत असत. कराची मुक्कामात डॉ. दत्ताराम खानोलकर यांच्या घरी ते सर्वांची भेट घेत असत. डॉ. विश्वनाथ पाटील आणि तुकाराम कांदळगावकर हे त्यांचे खास मित्र होते. मुंबईत आल्यावर आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांची भेट घेतल्याशिवाय ते राहत नसत. त्यांच्याविषयी त्यांना प्रचंड आदर होता. आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर हे नाईक मराठा मंडळाचे संस्थापक होते. दोघेही एकाच समाजासाठी काम करत होते फक्त संस्था वेगळ्या होत्या. दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड आदर होता.      

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद त्यांचे परम मित्र होते. रायसाहेबांनी आपल्या एका मुलाची रवानगी वैदिक ब्रम्हचारी चे जीवन जगण्यासाठी स्वामींच्या हरिद्वार येथिल आश्रमात केली होती. रायसाहेब धार्मिक होते. त्याचबरोबर धर्मसुधारणेवर त्यांचा भर होता. काशी येथे विद्वान पंडीतांची ते वेळोवेळी भेट घेत आणि चर्चा करत. रायसाहेब डॉ. खानोलकर यांच्या संस्कृत प्रेमाबद्दल लिहिताना सावित्रीबाई खानोलकर यांनी म्हटले आहे की,  "He had the perfect pronunciation of a Pundit and seemed to relish every word. Do you know that there are more than 20 words in Sanskrit for Water? He would tell me in the way people speak of some wonder of magic and then proceed to enlighten me as to each word and its meaning. I listened bemused and entranced by the music of those words even though I understood nothing of them at that time. I gather, it is from him that I acquired the love of Sanskrit and the desire to learn this perfect and alas neglected language." 

रायसाहेबांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, उर्दू, पुस्तू, पर्शियन इत्यादी भाषा अवगत होत्या. कालीदासाचे शाकुंतल तर त्यांना पूर्ण अवगत होते. तसेच पर्शियन कविता मुखोद्‌गत होत्या. रायसाहेब संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी काशी येथील पंडीतांच्या सहवासात काही महिने घालवत असत. त्यांना वाचनाचे प्रचंड वेड होते. क्वेटा येथे त्यांचे स्वत:चे ग्रंथालय होते ज्यात जगातील दुर्मिळ ग्रंथांचा समावेश होता. १९३५ च्या दुर्दैवी भूकंपात हे ग्रंथालय जमीनदोस्त झाले. त्यांनी मुक्तवली कंठाभरणशाडंकर भाष्य हे संस्कृत ग्रंथ छापण्याचा कामी बरेच सहाय्य केले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी संस्कृत-धात्वर्थ-मंजुषा नामक ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथाला जर्मनीतून प्रचंड मागणी आली होती. त्यांनी काही काळ केसरी वृत्तपत्रासाठी लेखन केले. चीन मध्ये असताना चीनची संस्कृती तेथील चालीरीती या संबंधित लेखं "चीनची पत्रे " या सदरात लिहिले.

डॉ. खानोलकर यांचा परिवार बराच मोठा होता. त्यांचे आठ पुत्र, एक कन्या, सुना, नातू नाती, नोकर चाकर मिळून ३०-३५ लोकांचे मोठे कुटुंब होते. "बाबा" ह्या टोपणनावाने ते कुटुंबात प्रसिद्ध होते. संपूर्ण कुटुंबावर त्यांच लक्ष असे. क्वेटा मध्ये त्यांचा मोठा वाडा होता तसेच मठ वेंगुर्ले येथे मूळ घर होते. वाड्याची आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांची पत्नी जानकी (ताई) खानोलकर यांच्यावर असे. डॉक्टरांनी सर्व कुटुंबियांना योग्य त्या सोयी पुरवल्या. त्यांच्या उच्चशिक्षणाची सोय केली. खानोलकरांच्या कुटुंबात शिक्षण हे सक्तीचेच होते. त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विष्णुपंत रामजी खानोलकर यांनी वडीलांच्या इस्पितळात सर्जन म्हणून काम पाहिले. त्यांचे दुसरे पुत्र कर्करोगतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. वसंतराव खानोलकर. मेजर जनरल विक्रम रामजी खानोलकर. नातू रावसाहेब मधुसूदन खानोलकर आणि डॉ. प्रकाश खानोलकर. सून सावित्री खानोलकर ज्यांनी परमवीर चक्राची निर्मिती केली. या सर्वांनी तसेच खानोलकरांच्या पुढच्या पिढीने रायासाहेबांची कीर्ती साऱ्या जगात पसरवली. रायसाहेबांचे बंधू कै. विठ्ठल खानोलकर यांनी आपल्या जेष्ठ बंधूने सुरू केलेले समाजकार्य तसेच चालू ठेवले. त्यांनीच मठ येथिल डॉ. खानोलकर हायस्कूल बांधून पूर्ण केल.                      
रायसाहेब डॉ. रामजी खानोलकर यांनी प्रामाणिकपणे जे समाजकार्य केले होते त्याची दखल तत्कालीन सरकारने घेतली. १९२८ साली त्यांना "रायसाहेब" हा खिताब देवून गौरविण्यात आले. १९३२ साली त्यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत संपतराव गायकवाड, बडोदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मित्रपरिवाराने श्री जगन्नाथ शंकरशेठ यांच्या दिवाणखान्यात त्यांचा मानपत्र देवून सत्कार केला.      

अशा या समाजसुधारकाचा आणि समाजनेत्याचा मृत्यू  ३१ मे १९३५ रोजी पहाटे ३:०२ मी. क्वेटा शहरात घडलेल्या भयानक भूकंपात झाला. त्यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू या भूकंपात झाला. क्वेटातील ६०००० लोकांचा मृत्यू या भूकंपात झाला होता. डॉ. खानोलकर विचारवंत, समाजसुधारक आणि बुद्धिवादी होते. त्यांनी आपल्या कार्याने स्वत:चा ठसा उमटवला. सामजिक बांधिलकी त्यांनी जपली होती. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या विकासासाठी खर्ची घातल. स्वत:चा आदर्श समाजासमोर ठेवला. कोकण आणि कोकणी लोक यांच्याबद्दल त्यांना फार आपुलकी होती. कोकणातील शिक्षणप्रसाराला त्यांनी हातभार लावला. त्यांचा मुत्यू दुर्दैवी होता पण त्यांच निस्वार्थी कार्य कायम आपल्या सर्वांच्या हृदयात राहील यात शंकाच नाही. त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण आणि त्यांच समाजकार्य पुढे चालू ठेवणे हे आता आपलं कर्तव्य आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की असे महापुरुष ज्या समाजात जन्मले त्या समाजाचा अभिमान बाळगा आणि सर्वच मानवी समाजाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी कार्यरत राहा. धन्यवाद.

जीवितान्मरणं श्रेष्ठ परोपकृतिवर्जितात् ।
मरणं जीवितं मन्ये यत्परोपकृतिक्षमम् ॥

1935 Balochistan earthquake

Monday 2 April 2012

आमची शाळा - भाग १

शाळा चित्रपट पाहिल्यावर मलाही माझ्या शाळांची आठवण झाली. अनेकवचन यासाठीच की माझे आजोबा आई वडील सगळेच प्राथमिक शिक्षक. सुभेदार मेजर पणजोबांनी हातात घेतलेली तलवार खाली ठेवल्यावर पुन्हा कुणी उचलली नाही. उचलली ती केवळ लेखणीच. असो तर महत्वाच हे की आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आमची भटकी जमातच झाली होती. बदली झाली की शाळा बदलली. मी आरवलीत माझी बालवाडी पूर्ण केली. आरवली म्हणजे शिरोड्याच्या बाजूलाच पेडण्याहून अगदी जवळ. पुढे पहिली-दुसरी आणि तिसरी इयत्ता उभादांडा शाळा नं. २ मध्ये, चौथी ते सातवी मठ शाळा नं. १, आठवी - दहावी जनता विद्यालय तळवडे, अकरावी - बारावी राणी पार्वतीदेवी ज्यु. कॉलेज सावंतवाडी, पदवी शिक्षण कुडाळ आणि पदव्युत्तर रत्नागिरी.

कॉलेज विश्व हे एक वेगळंच जीवन असत. शाळा म्हटली की माझ्या डोळ्यासमोरून माझ पाचवी ते दहावीच जीवन एखाद्या फिल्मसारख सरकत जात. विशेषतः हायस्कूल. सावंतवाडीहून अर्ध्या तासाच्या अंतरावर तळवडे नावाच एक सुंदर गाव आहे. जबरदस्त सांस्कृतिक आवड असलेलं गाव. येथे बाराही महिने काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम असायचेच. मी त्यावेळी अनेक प्रसिद्ध नाटके याच गावातील रंगमंचावर पाहिली. श्रीमंत गाव. तर अश्या या गावात आमच श्री जनता विद्यालय आहे. शाळेतले ते दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आमच्या या शाळेत तीन तुकड्या होत्या अ, ब आणि क. मी अ तुकडीतला विद्यार्थी होतो. गावातील तथाकथित सुशिक्षित लोकांना कॉन्व्हेंट च आकर्षण होत. पण अस आकर्षण आम्हाला कधीच नव्हत कारण जनता विद्यालयात जे शिक्षण मिळणार ते कितीतरी पटीने चांगल असेल याची आम्हाला खात्री होती.

तीन वर्षाने शाळेने मला बरच काही दिल. मला आमचे पाटकर सर कायम आठवतात. असा दरारा की लांबून त्यांना बघितलं की मुल पळून जायची. पाटकर सरांबद्दल आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना भीतीयुक्त आदर होता. त्यांच्या हातचा मार खायची हिंमत कोणातच नव्हती. सरांचा तास असला की सर आम्हाला संपूर्ण जगाची फेरी मारून आणायचे. जागतिक घडामोडी आणि त्याचा परिणाम याची आवड मला याच दरम्यान निर्माण झाली. Y2K काय आहे हे आमच्यापेक्षा मोठया असलेल्या मुलांना माहिती नव्हते पण आम्हाला मात्र पूर्ण माहिती होती. कारण फक्त पाटकर सर. पेडणेकर सरांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. सहामाही परीक्षेत मराठीत केवळ ४८ मार्क्स मिळाल्याच दुःख माझ्यापेक्षा पेडणेकर सरांना जास्त होत. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल आणि दहावीत मी ७८ गुण मराठीत मिळवले. शिस्त मोडल्यावर मालवणकर सर आणि गणिताच्या पवार सरांच्या हातचा मारही खाल्ला. मार कसला थोबाडीतच मारली होती. सगळ जग हलल्यासारख वाटल होत. पण एकदा मार खाल्ल्यावर पुन्हा शिस्त मोडण्याची हिंमत नाही झाली.

आमच्या वर्गात तशी इरसाल मुले होती. मला अजूनही आमचा अड्डा आठवतो. शाळा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आम्ही जवळच्या सातेरी मंदिरात जमायचो. त्यावेळी मी घोडेस्वार होतो अर्थात सायकल. हे मंदीर परिसर म्हणजे सायकल फिरविण्याची आवडती जागा. जरा पुढे उंचावर एक छोट मंदीर होत आता नाव नाही आठवत पण तोही आमचा अड्डा होता. प्रार्थना चुकविणारी मुले तिथे थांबायची. मला आठवतंय प्रार्थना चुकली तर शिक्षा असायची. चुकून कधी उशीर झालाच तर ही शिक्षा चुकविण्यासाठी आम्ही सरांची नजर चुकवून हळूच रांगेत घुसायचो. शाळेच लांबच्या लांब मैदान आम्ही फुटबॉल खेळण्यासाठी वापरायचो. दुपारची जेवणाची सुट्टी त्यासाठीच होती. पटापट डब्यातल खावून गेटावरच्या दुकानात जावून वाटाणे किंवा फुटाणे आणायचे (आम्लेट पाव ही आमच्यासाठी त्यावेळी पार्टी दिल्यासारखच होत.) आणि ते संपवून नंतर रबरी छोट्या बॉलने फुटबॉल खेळायचा हा आमचा नित्यक्रम झाला होता. मला आठवतय मी, दोन अमित, रोशन, कांता, विवेक आणि आमचे इतर मित्र कधी एकदा मैदानावर जायला मिळतय याची वाट पाहात असायचो.

किस्से अनेक आहेत पण कायम स्मरणात राहण्यासारखा किस्सा म्हणजे आमची शालेय निवडणूक अगदी थाटात असायची. मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, वर्गमंत्री वगैरे सगळी पद असायची. मीही आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटची निवडणूक याच काळात लढलो. आमच्या शाळेत प्रचारही करणे बंधनकारक होत. अगदी सभा वगैरे सगळ चालायचं. मी क्रीडामंत्री या पदासाठी उभा होतो. तरी ४ उमेदवार रिंगणात होते. त्यात माझी उमेदवारी मजबूत होती. प्रचार सभा घेतली. गंमत म्हणजे माझ्या विरोधी पक्षातील मुलांनी मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो आहे अशी अफवा पसरवली. ज्यांनी अफवा पसरवली त्यांच्याशी माझी बाचाबाची देखील झाली आणि माझ निवडणूक हरणं नक्की झाल. मतदानाचा दिवस उजाडला. निकाल माझ्यासाठी धक्कादायक होता. मला दोन नंबरची मत मिळाली होती. नियमाप्रमाणे मी उपमंत्री झालो होतो. केवळ दहा मतांनी मी हरलो होतो पण हा एक वेगळाच अनुभव होता. ज्या लोकशाही परंपरेनुसार आपला देश चालतो त्याच बाळकडूच आम्ही प्यालो होतो.

शाळा म्हटल की लाईन हा विषय आलाच पण त्या वयात ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. आम्ही एकमेकांना खूप चिडवल लाईनच्या नावावरून. अगदी बापाच्या नावावरुनही चिडवलय. आमच्याकडे बिलीमारो पण होता, बेलदार पण होता आणि टिंग्या पण होता. अगदी प्रत्येक शाळेत असतो त्याप्रमाणे. शाळेबद्दल लिहाव तेवढ कमी आहे. शाळा सोडून जाताना प्रत्येकाला दुःख हे होत असतच. शाळा आपल्याला आठवणीची शिदोरी देते. आयुष्यभर पुरण्याइतकी.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters