माझे ब्लॉगींग .....
तो सन २००७ डिसेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा होता. मी नेहमीप्रमाणे इंटरनेटच्या मोहजालातून फेरफटका मारत होतो. सहज माझी नजर ब्लॉगवाणी या संकेतस्थळावर गेली. यापूर्वीही मी ब्लॉग्जबद्दल बरेच काही ऐकले होते पण ब्लॉग बनवण्याची इच्छा झाली नव्हती. मी माझ्या संकेतस्थळांच्या दुनियेतच खूश होतो. पण त्या दिवशी मला
हरेकृष्णाजी हा ब्लॉग सापडला. ब्लॉग पाहून असे वाटले की मराठीत सर्वसमावेशक ब्लॉग आहेत. ते संख्येने कमी असले तरी आहेत. आपणही एखादा सर्वसमावेशक ब्लॉग तयार करावा, ज्यावर आपले विचार मांडता येतील. मराठी ब्लॉग म्हणजे कविता आणि कथा असेच मला वाटत होते पण काही ब्लॉग पाहून माझे विचार बदलून गेले.
या गोष्टीला आज पाच महिने पूर्ण होत आहेत. माझी दिनचर्या पूर्ण बदलली आहे. सकाळच्या चहाबरोबर आता ब्लॉगवाणी किंवा मराठीब्लॉग्ज डॉट नेट लागतो.
कोणी काय लिहीलयं याची उत्सुकता.
खट्टा मिठा मध्ये आज कुठला इतिहास दिला आहे?
प्राजक्ताने आज कोणत्या
पाककलेबद्दल लिहीले आहे?
आज
मोरपीसमध्ये नविन काय आहे?
आज
महाभारतातील कोणती कथा वाचायला मिळणार?
यासगळयाचीच उत्सुकता. माझे जिवन ब्लॉगमय झाले आहे. दिवसातून २ तास मी इतरांचे ब्लॉग वाचतो. वाचनातून बरेच काही शिकता येते. गंभीर ,मनोरंजक, हलकेफुलके, राजकारण, क्रिडा,
चित्रपट, आरोग्यविषयक, पाककला काय नाही ब्लॉग्जच्या दुनियेत ते सांगा? कंटाळा आला की हास्यमेव जयते आहेच मनोरंजनासाठी. अगदी
ऑनलाइन कादंबरीही वाचता येते. केवळ कॉपी-पेस्ट ब्लॉगही आहेत पण ते कधीच लोकप्रिय होवू शकणार नाही. शेवटी नवनिर्माण आणि कल्पकताच तग धरते हे लक्षात असू द्या.
मित्रांनो आपल्या ब्लॉगींगचा धसका बऱ्याच जणांनी घेतला आहे. जास्तीत जास्त ब्लॉगर्स हे पक्षनिरपेक्ष लेखन करतात (अपवाद काही ब्लॉगर्सचा जे तळी उचलून लिखाण करतात.) आणि त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते. त्यामुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. रस्ताचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असो किंवा नेत्यांची होर्डींग्ज असोत ब्लॉगर्स नेहमीच हे प्रश्न मांडतात. पण काही प्रमाणात आपल्यालाही स्वतः ठरवलेली आचारसंहिता पाळणे गरजेचे ठरते. धर्मांध ब्लॉग्ज तुम्ही पहातच असाल. अत्यंत स्फोटक आणि चिथावणीखोर विचार या ब्लॉग्जमध्ये आहेत. भारतीय संघराज्याच्या ,भारतीय ध्वजाच्या, भारतीय राष्ट्रगीताच्या आणि अस्मितेच्या विरोधात लिहीणे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे.
जेवण म्हणजे मराठी माणसाचा विक पॉईंट. रोजरोज नवनविन पाककला शिकवणाऱ्या प्राजक्ता आणि
रुचिरा कधी सोबती बनल्या कळलेच नाही.
चकलीनेही बरच काही शिकवलं. गेला पूर्ण आठवडा या ब्लॉग्जच्या दुनियेपासून दूर होतो पण प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांची आठवण येत होती. कधी एकदा परीक्षा संपते याचीच वाट बघत होतो. प्रतिक्षा संपली. लिखाण सुरु.......
- वामन परुळेकर